Wednesday 5 November 2014

विकासकाचे“ब्रँड” बिल्डिंग


विकासकाचे“ब्रँड” बिल्डिंग

ब्रँड म्हणजे काय?
ब्रँडचे फायदे कोणकोणते?
व्यवसायामध्ये ब्रँड आवश्यक आहे का?
                विकासक[Builders/Developers]यांच्यासाठीवरील प्रश्नांची उत्तरे शोधण्यापूर्वी वास्तवातले एक उदाहरण पाहुया.
                [१] मुंबई परिसरमध्ये एखाद्या खाजगी विकासकाने [म्हाडा नव्हे...] एखादी गृहनिर्माण स्किम जाहीर केली तर त्या स्किमचे लोकेशन न पाहता देखील त्या विकासकाच्या स्किमला प्रतिसाद देण्यासाठी अनेक ग्राहक “रांगा” लावून बुकिंग करतील का?
                [२] जेव्हढे फ्लॅटस् अलॉट करायचे आहेत त्यापेक्षाजास्त व अनेकपटीने बुकिंग व त्यासाठीची बुकिंग अनामत अमाउंट ग्राहक त्या विकासकाच्या बँक खात्यामध्ये ग्राहक जमा करतील का?
                [३] आपल्याला फ्लॅट मिळावा म्हणून ग्राहकवर्ग त्या विकासकाने आवश्यक केलेले १०,०००/-रुपये बुकिंग अनामत अमाउंट व फॉर्म्ससाठी [२००/-रुपये नॉन-रीफंडेबल] भरतील का?
                [४] स्कीममध्ये आलेल्या बुकिंगपैकी, आपले मापदंड व निकष लावून त्यातील काही ग्राहक निवडून बाकीच्यांना न निवडता त्यांचे पैसे परत करण्याचे काम तो विकासक करेल का?
                [५] निवडले न गेलेल्या ग्राहकांना विहित मुदतीमध्ये त्यांनी भरलेली बुकिंग अनामत अमाउंट [त्यावर कोणतेही व्याज न देता] परत केली गेल्याचे उदाहरण असू शकते का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे... “होय”असू शकतील का?
ही सर्व उत्तरे जर “होय” असतील तर.......
हा विकासक म्हणजेनक्कीच एक ब्रँड आहे….
कोणता “ब्रँड”आहे हा??
कोण आहे हा विकासक????
                मुंबईत रियल इस्टेट व्यवसायात मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यापर्यंत त्या वर्षीचे खरेदी-विक्रीचे बहुतेक व्यवहार पूर्ण झालेले असतात म्हणून तो काळ वर्षातील सिझनचा शेवट समजला जातो. नंतर पावसाळा सुरु होणार असतो. सर्वसाधारणपणे नवीन स्कीम्स पावसाळ्यानंतर दिवाळीच्या दरम्यान जाहीर होतात.
                २५-५-२००९ ला सीझनच्या शेवटी वर्तमानपत्रांमध्ये मुंबई परिसरातील बांधकाम संबंधित एक जाहिरात झळकली. मुंबईजवळ कमी किंमतीमध्ये परवडणारी घरे. बुकिंगचा दर १३७८/-रुपये.
                या योजनेचे वैशिष्ट्य हे होते की ग्राहकांनी त्या स्कीमची साईट पहावी, त्यांना ती आवडली व त्यांची खरेदीची इच्छा असल्यास ग्राहकांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांमधून २००/-रुपये किंमतीचा [नॉन-रीफंडेबल] फॉर्म घेवून तो योग्य पद्धतीने सर्व माहितीसह भरून १०,०००/- रुपये बुकिंग अनामत अमाउंटसह स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांमध्येच स्कीमसाठी जमा करायचे होते.
                जर का त्यांना फ्लॅट अलॉट झाला तर पुढची प्रक्रिया सुरु होणार होती. जर का फ्लॅट अलॉट नाही झाला तर काही मुदतीने त्यांनी भरलेली १०,०००/- रुपये बुकिंग अनामत अमाउंट कोणत्याही व्याजाशिवाय त्यांना परत मिळणार होती.
\               मात्र फॉर्मसाठीचे २००/-रुपये नॉन-रीफंडेबल असल्यामुळे परत मिळणार नव्हते.याचा अर्थ या योजनेमध्ये भाग घ्यायचा असेल तर फॉर्मचे २००/- रुपये नक्की परत मिळणार नाहीत. फ्लॅट अलॉट होईलच ही शाश्वती नाही. आणि फ्लॅट अलॉट नाही झाला तर काही महिन्यांनी फक्त भरलेली बुकिंग अनामत अमाउंट कोणत्याही व्याजाशिवाय परत मिळणार होती हे स्पष्ट करण्यात आले होते.
                ग्राहकांनी त्या योजनेला प्रचंड भरभरून प्रतिसाद दिला. माझ्या काही मित्रांनी मुंबईतील बँकेमध्ये अक्षरश: क्यू मध्ये उभे राहून फॉर्म्स मिळवले व भरले. माझ्या अनेक मित्रांनी साईट प्रत्यक्ष पाहिली नव्हती पण तरीही या योजनेमध्ये वेळ व पैसा खर्च करून भाग घेतला. त्यापैकी बहुतेकांना फ्लॅट अलॉट झाले नाहीत. त्यामुळे त्यांना हळहळतांना मी स्वत: पाहिले आहे.
                दरम्यान २००९ ला जागतिक मंदीचे सावट भारतावर पडले.... रियल इस्टेट व्यवसाय देखील या मंदीला अपवाद नव्हता. भल्याभल्या विकासकांची झोप उडाली होती. हा प्रोजेक्ट ज्या परिसरात होता तिथे रेल्वे स्टेशनपासून सर्व ठिकाणी ४०% डिस्काऊंटचे बोर्ड्स जागोजागी लागले होते.
                दरवर्षीप्रमाणे मुंबईतील सर्वात मोठे प्रॉपर्टीएक्झिबिशन बांद्रा येथे १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर २००९ ला सुरु झाले.या संपूर्ण  एक्झिबिशनवर मंदीचे सावट स्पष्ट दिसत होते. दरवर्षी प्रमाणेच या एक्झिबिशनला मी हजेरी लावली होती. मला स्वत:चा एक सर्व्हे पूर्ण करायचा होता म्हणून मी काही ग्राहक मित्रांसह प्रत्येक विकासकाच्या स्टॉलला भेट देत होता. बहुतेक ठिकाणी २०% ते ३०% ते ४०% डिस्काऊंट कबुल केले जात होते. समोर पैसे घेवून बसाल तर अजून पैसे कमी करू अशा घायकुतीला अनेक विकासक येत होते.
                वर नमूद केलेल्या “त्या” स्कीमच्या स्टॉलला मी व माझ्या ग्राहक मित्रांनी भेट दिली. “त्यांनी”  देखील त्यांच्या दरांमध्ये फरक केला आहे का? त्यांनी किती पर्सेंट डिस्काऊंट दिला आहे हे पहायला मी व माझे मित्र अतिशय उत्सुक होतो....

त्यांनीसुद्धा फरक केला होता....तो होता.. ४०%..

पण... तो डिस्काऊंट नव्हता तर
“त्यांनी” ४०% दर वाढवले होते….

                २५ मे २००९ ला स्कीम जाहीर करतांना त्यांचे दर होते १३७८/-रुपये ते आता होते जवळपास १९७५/-रुपये.... म्हणजे बाकी सर्व विकासक २०-३०-४०% डिस्काऊंट देत असतांना त्यांनी त्यांचे दर जवळपास ४०% वाढवूनही त्यांना त्या प्रदर्शनात अतिशय चांगला प्रतिसाद होता.... हा महिमा होता “त्या” नावाचा........
“टाटा”
                हे टाटांच्या बोईसर येथील हौसिंग प्रोजेक्टबाबतच लिहितोय. टाटा म्हणजे “विश्वास” उत्कृष्ट दर्जा व टिकावूपणा. यावर कुणी म्हणेल की टाटांचा तो प्रकल्प मुंबईबाहेर परवडणाऱ्या किंमतीमध्ये होता म्हणून प्रतिसाद मिळाला वगैरे.. त्यांनी लक्षात घ्यावे की मंदीच्या त्या काळात अनेक मोठ्या बांधकाम व्यवसायिकांनी, टाटांना मिळणारा प्रतिसाद पाहून त्याच परिसरामध्ये टाटांपेक्षा कमी किंमत ठेवून [दर १२००/-रुपये] प्रकल्प सुरु केले पण त्यांना टाटांच्या प्रतिसादाच्या थोडं देखील जवळपास जाता आले नाही.अर्थात, त्यात मला कोणतेही आश्चर्य वाटले नाही व वाटणार नाही....
आहे का या देशात कुणी....जो....
“टाटा” या ब्रँडची बरोबरी करू शकेल?
                टाटांशी तोच बरोबरी करू शकेल जो दर्जा आणि टिकावूपणा याबाबतची विश्वसनीयता ग्राहकांच्या मनात सातत्याने व दीर्घकाळ जागवू शकेल. आपली प्रतिमा व विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी सदरहू प्रकल्पामध्ये टाटा ग्रुपने योग्यरीत्या कार्यरत रहायला हवे.टाटा ग्रुपप्रमाणे प्रत्येकाने चांगल्या शेतकऱ्यासारखे वागले पाहिजे.
                पिक चांगले हवे असेल तर ते घेण्यापूर्वी शेताची नीट मशागत केली पाहिजे, सुरुवातीला जास्त खर्च करून जाणीवपूर्वक चांगल्या बियाण्याची पेरणी केली पाहिजे. तीच बाब व्यवसायाची. तरच आज टाटा मिळवत आहेत ती विश्वसनीयता,नावलौकिक, ग्राहकांचा प्रतिसाद, स्पर्धारहित व्यवसाय व नफा मिळू शकतो.